मतदान संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेला अधिकार लोकशाही राज्यव्यवस्थेचे प्रतिक. लोकशाही व्यवस्थेचे चार प्रमुख आधारस्तंभ कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, आणि वृत्तपत्रे यांचा मूलभूत पाया म्हणजे एक सामान्य नागरिक आणि त्याची समाजात असणारी भूमिका जागरूकता आणि त्याचे मतदान ठरवत असते. आधारस्तंभांची निव मजबूत राहील की नाही हे सर्वस्वी सामान्य नागरिकावर अवलंबून असते. कारण देशाचा कर्ता धर्ता प्रमुख आपण निवडून देत असतो. म्हणून तो आपल्या देशाची समाजाची सुरक्षा व विकास करेल की नाही याचा अंदाज घेऊनच एक नागरिकाने आपले मत दिले पाहिजे.
पूर्वीचा कल पाहता आज जरी तंत्रज्ञान प्रगती पथावर असले तरी भारताला स्वातंत्र्य मिळण्यापासून तर त्यांचे हक्क अधिकार मिळवून जागृकता पसरवण्यापर्यंत अनेक प्रयत्न नेते व सामाजिक जान असलेल्या व्यक्तींनी केले. आणि म्हणून आज आपण हे आयुष्य जगत आहोत. भारत लोकशाहीप्रधान देश मानला जातो. पण हे फक्त आता पुस्तकात बरे वाटते. भ्रष्टाचार, लाचारी, काळा बाजार, राजकारण हे शब्द आता अपरिचित वाटत नाही. जो तो पैशासाठी लढतो आणि पैशासाठी जगतो. आज आपण म्हणतो की राजकारण हे वाढत चाललंय इतक की त्याला सुमार नाही. पण तेच नेते आपण निवडून दिलेले असतात. आज राजकारणी नेते मंडळी भ्रष्टाचार करताना दिसतात किंवा देशाला एक सुजाण नवा चेहरा मिळत नाही. तेच राजकारणी ते वारसान्वये पुढे येतात. आणि जर कधी एखादा नडलाच तर त्याला टिकून देत नाही. राजकारण इतक वाढत असत की पैशासाठी गरीब विकला जातो मतदार विकला जातो, उमेदवार विकला जातो, विरोधी पक्ष विकला जातो. कधीच गावाकडे न फिरकणारे शेतकऱ्यांच्या अन्नावर जगणारे मतदानाच्या वेळी पैसे वाटताना मत विकत घेतात. आणि लाचार मतदाता मत विकतो. आणि पाच वर्षे भीक मागतो. अशी आजची अवस्था. आज आपण दुसऱ्याला बोलतो याला मत नका देऊ बर का आणि आपणच मत देऊन बसतो. आणि ह्याच नेते मंडळींचा एखाद्या गरिबाच्या खुनामध्ये हात असतो. आणि तेव्हा आपण आंदोलने करतो.
आज मतदान जनजागृती करूनही त्याचा फायदा होत नाही. मुळात आपली मते जातात कुठे? आपण आपले मत नेमके देतो का?अन् दिले तर योग्य उमेदवाराला देतो का? हे महत्वाचे मुद्दे आहे. पाहायला गेले तर आपल्यापेक्षा आपली जुनी पिढी जास्त जागरूक असते. आज अस झालंय की बाहेर काय घडत हे पहायला देखील आपल्याला वेळ नाही. तर आपण बातम्या अन् घडामोडींच्या भानगडीत पडतच नाही. निदान आधीची पिढी तरी आपल्या देशात काय चाललंय बाहेर काय चाललंय हे पाहते तरी. अन् दुसरा मुद्दा असाही येतो की प्रत्येक बातम्या ह्या वास्तववादी नसतात. मुळात घटना असते एक आणि पसरवली जाते एक. त्यामुळे जनतेचा देखील राजकारणात रस राहत नाही. असे असले तरी देशाचे उज्वल भविष्य हे आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे. अन्यायाकडे दुर्लक्ष करण्यापेक्षा आवाज उठवलेला कधीही चांगला. पण इथे अजून आपल्याला आपले अधिकार हक्क आणि मतदानाचे महत्व सांगून देखील पटतं नाही. म्हणून सर्वप्रथम एक मतदारच अयोग्य उमेदवार निवडून दिलेल्या राजकारणाचा दोषी ठरतोय. आणि म्हणून आज तो उमेदवार आपली मनमानी करून आपला पैसा वापरून आपल्या हातात रुपया टेकवतोय.किमान नाही विकास पण पहिली सुरक्षा आणि गुन्हेगारास कठोर शिक्षा तर वेळीच द्या. अशी वेळ आज भारतावर आली आहे. आज प्रत्येक नागरिकाने राजकारणाला दोष देण्यापेक्षा स्वतः जागरूक होणे गरजेचे आहे. जेव्हा आपल्याला बदल घडवण्याची संधी असते तेव्हा आपण लाचार होऊन मतदान करतो. जर योग्य उमेदवार कुणीच नसला तर ‘NOTA’ पर्याय आहेच की जर योग्य पर्याय निवडला तर कशाला कोण निवडून येईल. जो पर्यंत योग्य मतदान जागरूकता होत नाही तो पर्यंत राजकारण हे काहीच बदलणार नाही.
